सीमावाद पेटला; कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून - 15 दिवस जमावबंदी...
- MahaLive News
- Dec 9, 2022
- 1 min read

कोल्हापूर- महाराष्ट्र सीमावाद आता पुन्हा एकदा पेटल्याचं चित्र दिसून येत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आलीय. ही जमावबंदी 15 दिवसांसाठी असणार लागू आहे. दरम्यान, या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणुका आणि सभांनाही बंदी असणार आहे.
अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी काल 8 डिसेंबर रोजी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आलं आहे. सीमाप्रश्नावरुन महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असतील.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1)अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराज अवमानाच्या निषेधार्थ शनिवारी (10 डिसेंबर) कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्याची घोषणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारचे सीमावासियांवर होणारे अत्याचार यावर विचारविनिमय करण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक झाली.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीम, काँग्रेसचे सतेज पाटील, जयश्री जाधव, शिवसेनेचे संजय पवार यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते.
Comments